?
Ask Question
आज, १ एप्रिलपासून राष्ट्रीय अंधत्व प्रतिबंध सप्ताह सुरू होत आहे. सध्या देशात दृष्टीदोषाचे प्रमाण वाढले आहे. दृष्टीदोष वाढण्यामागची कारणे काय? आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत या लेखातून समजून घेऊयात. 



डोळे ज्यांनी आपण जग अनुभवतो, सगळं काही पाहाता येतं म्हणून समजून घेता येतं. जेव्हा डोळ्यांपुढे फक्त अंधार असेल तेव्हा काय, असा विचारही केला तरी अंगावर काटा येतो. आपल्या भारतात लाखो व्यक्ती दृष्टिहीन आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या नव्या अहवालानुसार देशातील अंध व्यक्तींची संख्या 47.1 टक्क्यांनी घटली आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. परंतु, लायब्ररी ऑफ मेडिसीन आणि स्टॅटेस्टीकाच्या 2022 च्या अहवालात असे नमूद केले आहे की, भारतातील मागील तीन वर्षांमधील दृष्टीदोषाचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. बऱ्याचशा डॉक्टर आणि संशोधन अहवालानुसार यास बऱ्याचअंशी बदललेली जीवनशैली कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. 
दृष्टीदोष वाढण्यामागील कारणे काय? (reasons behind the increase in visual impairment)
जगाबरोबर चालण्यासाठी, नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल केले. या बदलांमुळे जशा चांगल्या गोष्टी घडत आहेत, तसे त्याचे काही दोषही आपल्या पदरी पडले आहेत. सध्या आपण सतत स्मार्टफोन पाहात असतो. सध्याच्या कामाच्यापद्धती एवढ्या बदलल्या आहेत की ओव्हर टाईमच्या नावाखाली  9 ते 10 तास ड्युटी सुरू असते. ड्युटी म्हणजे काय तर कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरचं काम ज्यामुळे डोळ्यांवर खप ताण येतो. त्यात आपण कामातून ब्रेक घेतला की मोबाईलच्या स्क्रिनवर येतो, ज्यामुळे डोळे आणखी थकतात.
 
सध्या इन्स्टाग्रॅमेबल दिसण्यासाठी आपण स्वत:ला अपटूडेट ठेवतो खरं, मात्र त्यासाठी विविध प्रोडक्टचा वापर करतो. हे प्रॉडक्ट बऱ्याचदा केमिकलयुक्त असतात. ज्याचा परिणाम आपल्या शरिरावर होतो. आपण केसांवर आणि चेहऱ्यावर जे प्रॉडक्ट वापरतो, त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर नकळतपण होत असतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळ, जाडपणा दिसू नये यासाठी क्रिम, कन्सिलर वापरतो ज्यामुळेही डोळ्यांवर परिणाम होत असतो. विशेषत: हेअरकलर वापरताना काळजी घ्यावी, कारण अनेक ब्रँड्सच्या हेअर कलरमुळे डोळे खराब होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. 
 
सध्या, आपल्यापैकी अनेकजण एसीरुममध्ये दिवसाचा बराच वेळ घालवतात. तर अनेकजण नैसर्गिक वातावरणात. मात्र या दोन्हींमध्ये आपल्या खाण्या-पिण्यामुळे, वातावरणातील विचित्र बदलांमुळे आपल्या शरिरात इन्फल्मेशन अर्थात उष्णता खूप वाढते. ही उष्णता शरिरात वाढते तशी डोळ्यांतही वाढते ही गोष्ट वरकरणी किरकोळ वाटत असली तरी याचे डोळ्यांसह शरिरावर दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या शरिराचं तापमान समशीतोष्ण (बॅलन्स) ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
 
जीवनशैली बदलांमुळे, शहर असो वा गाव सगळ्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आदी त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवले आहेत. या आजारांचा परिणाम विशेषत: मधुमेहाचा परिणाम दृष्टीपटलावर अर्थात रेटीनावर होतो. त्यामुळे आपण मधुमेह आणि इतर आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. 
डोळ्यांची निगा करशी राखावी? (How to take care of your eyes?)
सर्वप्रथम, रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. झोपून उठल्यावर तोंडात एक घोट पाणी ठेऊन, डोळ्यांवर चार ते पाचवेळा हलक्या हाताने पाण्याने हबके मारावेत. नंतर तोंडातील पाणी थुंकून द्यावे, यामुळे डोळ्यांतील उष्णता कमी होण्यास मदत होते. 
 
रोज जेवणात जीवनसत्त्व अ आणि ओमेगा थ्री युक्त पदार्थ असावेत. म्हणजे, गाजर, रताळ, केळं, दूध, आळशी, पालक आणि इतर पालेभाज्या आदींचे नियमित सेवन केलं पाहिजे. 
 
काम करताना किंवा अभ्यास करताना डोळ्यांवर ताण येतो, तो कमी करण्यासाठी दर 20  मिनिटांनी ब्रेक घ्यावा. या ब्रेकमध्ये 20 फुटांवर 20 सेकंदांसाठी एक टक पाहात राहावं, असा सल्ला आपल्याला दृष्टी तज्ज्ञ डॉ रुपेशकुमार यांनी दिला आहे. तसेच ते म्हणतात की, चाळिशीनंतर प्रत्येक व्यक्तीने डोळ्यांची नियमित तपासणी केली पाहिजे. कारण बऱ्याचदा चाळिशीनंतर डोळ्यांच्या समस्या वाढू लागतात. यासह, मधुमेही आणि इतर जीवनशैली आजारांचा सामना करत असलेल्या व्यक्तींनी न चुकता दर सहा महिन्यांनी डोळ्यांची विशेषत: दृष्टीपटलाची (रेटिना) तपासणी केलीच पाहिजे. 
 
तर, आपण शक्य तितकं आपलं आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करुया. निरोगी आरोग्य असेल तर आयुष्य सुंदर बनवणं सोप्पं होईल. त्यासाठीच आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेऊयात. 
 
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer